कैलास लेणी

      कैलास लेणी 

फेसबुक लिंक https://bit.ly/3kyrdYt
जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या वेरुळ मंदिराला किंवा कैलास मंदिराला स्थापत्यकलेतलं एक शिल्प म्हटलं जातं; कारण ते एका दोनशे फूट लांब, दीडशे फूट रुंद आणि १०० फूट उंच अशा खडकातून कोरून काढलेलं आहे. मंदिरबांधणीचे कडक निकष लावून हा खडक निवडण्यात आला. कारण, तो कोणतीही चीर, स्तर, पांढऱ्या रेषा आणि तडे नसलेला निर्दोष खडक होता. खरं तर हा महाकाय दगड आणखी एका त्याहूनही महाकाय दगडातून फोडून काढलेला आहे. हा विशाल दगडही बाजूला दिसतो. आश्चर्य म्हणजे या मंदिराचं स्थापत्य करणाऱ्यांना हजार वर्षांपूर्वी भूगर्भशास्त्राचं सखोल ज्ञान होतं. म्हणूनच ते एवढा मोठा निर्दोष दगड शोधू शकले.भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते .

कैलास लेणी
हिंदू , बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे या लेण्यांमधून आहेत . कळसापासून पायापर्यंत अशी निर्मिती झालेल्या कैलास लेणीतील कलाकुसर , कोरीव काम आश्चर्यकारक आहे . जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वेरूळला देश - विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात ...औरंगाबाद शहरापासून ३० कि . मी . वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ आहे . प्राचीन व्यापारमार्गाच्या छेदस्थानी वसलेल्या आणि शतकानुशतके पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या वेरूळचा उल्लेख अरब आणि युरोपियन प्रवाशांच्या प्रवासवर्णनामध्ये ठळकपणे आढळतो . चंद्रकोरीसदृश्य आकाराच्या डोंगरकुशीत वसलेली वेरूळ लेणी दख्खन पठाराभिमुख , दक्षिणोत्तर रेषेत वेरूळच्या डोंगरात सुळ्याच्या सहाय्याने कोरून काढण्यात आली आहेत . बौद्ध लेणी क्रमांक एक ते १२ची निर्मिती इसवी सन पाच ते सातव्या शतकादरम्यान , हिंदू लेणी क्रमांक १३ ते २९ची निर्मिती इसवी सन आठ ते नवव्या शतकादरम्यान आणि जैन लेणी क्रमांक ३० ते ३४ची निर्मिती इसवी सन नऊ व ११व्या शतका दरम्यान करण्यात आली .
सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने , प्रार्थना गृहे , विहार किंवा आश्रम ; तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे . पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत सुमारे ६०० वर्षे चाललेल्या येथील कोरीव लेण्यांमध्ये धूमर लेणे ( लेणी क्रमांक २९ ) वेरुळचे सर्वात प्राचीन असून , यातील प्रार्थना मंदिरात शिवलिंग आहे . या काळात बुद्ध , हिंदू , व जैन धर्माचे वर्चस्व होते . त्यामुळे या धर्मांच्या संस्काराचे प्रतिबिंब लेण्यातून उमटलेले दिसते . अप्रतिम अशा ३४ गुहांतील मूर्ती म्हणजे धार्मिक आणि कलात्मकतेने नटलेल्या उत्तुंग रचना आहेत . एकसंध प्रस्तरात अखंड पाषाणातील महाकाय कातळ कापून त्यांची निर्मिती झाली आहे . असे सांगितले जाते की , दोन लाख टन दगड याच्या निर्मितीकार्याच्या वेळी काढण्यात आला . ३४ लेण्यांमधील पहिल्या १३ बुद्धधर्मीयांचा , नंतरच्या १६ हिंदू धर्मीयांचा व उर्वरित पाच जैन धर्मीयांचा इतिहास दर्शविणाऱ्या आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, बुद्ध धर्माचा मानवतेचा व शांतीचा संदेश , हिंदूंचे कर्मकांडाचे व कथांचे महत्त्व , तर जैन धर्मीयांच्या अहिंसातत्त्वाचा व पौराणिक कथांचा विषय मोठ्या कलात्मकतेने व कौशल्याने कोरलेला आहे . या ३४ लेण्यांमधील ५ , ६ , १० , ११ , १४ , १५ , १६ , २१ , २९ व ३२ क्रमांकाच्या लेण्या अधिक देखण्या आहेत .जगप्रसिद्ध आणि प्रभावशाली १६व्या क्रमांकाची कैलास लेणी भव्यता आणि एकात्मता याबाबत अजोड मानली जाते . जगातील सर्वात मोठी एकसंध वास्तू म्हणून प्रख्यात असलेले हे लेणे म्हणजे वास्तुकलेचा , शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना आहे . कैलास लेणी ही ' आधी कळस मग पाया ' अशी तयार झालेली आहे . वेरूळ लेण्यांचे खोदकाम कसे झाले असावे , याची कल्पना १६व्या क्रमांकाची कैलास लेणी पाहताना येते . प्रथम रूपरेषा आखल्यानंतर छतापासून खोदकामास सुरुवात झालेली दिसते . दगड अत्यंत तीक्ष्ण हत्यारांनी खोदले जायचे . प्राथमिक खोदकाम जरी कुदळीसारख्या मोठ्या हत्याराने केले गेले असले , तरीही नंतरचे नाजूक कोरीव काम मात्र छिन्नी व हातोड्याने केलेले दिसते . डोळ्याचे पारणे फेडणारी ही कलाकुसर आहे . शैल्य स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे टप्पे या लेण्यात पहायला मिळतात . भारतीय शिल्पकलेचा हा सर्वोकृष्ट नमुना आहे . रामायण , महाभारतातील पौराणिक प्रसंग , शिव महात्म्य , विष्णू अवतार , लक्ष्मी , गंगा , यमुना , सरस्वतीचे चित्रण या लेणीत असून , ते लेणीचे देखणेपण वाढवतात .
वेरूळ येथील २१ क्रमांकाच्या लेणीत शिव - पार्वती विवाहाचा प्रसंग तर , २९ क्रमांकाच्या लेणीत शिवतांडव नृत्य दाखविले आहे . अर्धनारीनटेश्वरकडे दर्शनही येथे होते . ३२ क्रमांकाची लेणी अत्यंत आकर्षक आहे . याच्या छतावरही कोरीव शिल्पकला असून , तेथे कमलपुष्पं दाखविली आहेत . अजोड मूर्तीकलेचा अप्रतिम नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते . जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहताना शिल्पकला व चित्रकलेचे दर्दी आपल्या प्राचीन काळात अस्तित्वात होते , याची प्रचीती येते . या लेण्यांच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अथक परिश्रम घेत आहे . रसायनांचा वापर करून , विविध उपचार करून ती सुरक्षित ठेवण्याबरोबरच तिला नवी झळाळी देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहे . त्यामुळेच पुढच्या पिढीला हा हजारो वर्षांपूर्वीचा ठेवा पाहायला मिळत आहे .
युनेस्कोने सन १९८३मध्ये अजिंठा लेणी व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे . वेरूळ लेणी आज संपूर्ण जगाला आकर्षित करीत आहे . भारत हा युनेस्को वारसामध्ये सभासद देश म्हणून स्थापनेपासूनच आहे . या अंतर्गत भारतातील एकूण २८ ठिकाणे ' जागतिक वारसा स्थळे ' म्हणून आजपावेतो नोंदली गेली आहेत . भारत देशातील वारसा स्थळांच्या यादीची सुरुवात १९८३पासून अजिंठा लेणी , वेरूळ लेणी ( औरंगाबाद ) आणि ताजमहाल ( आग्रा ) यांच्या नोंदीने झाली . परदेशी पर्यटकांना वेरूळ लेणी पाहण्यासाठी आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत . जपान सरकारच्या मदतीने विकास योजनाही राबविल्या जात आहेत . पर्यटकांना वेरूळ येथे रेल्वेची सुविधा नाही . त्याचाही परिणाम पर्यटनावर होत आहे . अजिंठा - वेरूळ लेण्या रेल्वेने जोडण्याचा विचार होण्याची गरज आहे . दर मंगळवारी वेरूळ लेणी बंद असते . याविषयी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे . परदेशांतल्या , तसेच देशातल्या अनेक पर्यटकांना मंगळवारी लेणी बंद असल्याची माहिती नसते . त्यामुळे येथे आल्यावर त्यांचा हिरमोड होतो . वाढत्या प्रदूषणाचा फटका मानवी शरीर , पशुपक्ष्यांचे जीवन व सागरी जलचरांना जितका बसतो आहे , तितकाच तो प्राचीन बांधकामे , मंदिरे व लेण्यांनादेखील बसतो . पुरातत्त्व संशोधकांनी यावर वेळीच उपाय केले नाहीत तर हा प्राचीन सांस्कृतिक वारसा नष्ट होईल , असा गंभीर इशारा दिला जात आहे . आपल्या देशात अशा प्राचीन सुंदर स्थळी पर्यटकांची नेहमी गर्दी असते ; पण म्हणावे तसे याकडे लक्ष दिले जात नाही . जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेल्या वेरूळच्या लेण्यांच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने , लेण्यातील सूक्ष्म तड्यांतून झिरपणारे पाणी थांबविण्यासाठी विदेशी तज्ज्ञांनी मोठे काम केलेे . भारतीय पुरातत्त्व व भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन लेणी संवर्धनाचे अनमोल कार्य केले आहे . वेरूळ हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे . वाढते प्रदूषण आणि शेकडो वर्षांपासून उन पाऊस खाणाऱ्या येथील शिल्पकलांना धोका पोहचू नये , यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे .
आज अनेक दशकांनंतरही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग जतनीकरणाचं काम सातत्याने करतच आहे. यातून या मंदिराची नवीन रूपं समोर येत आहेत आणि प्राचीन भारतातलं हे आश्चर्य बघण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या समूहांना इथे येणं सोपं होत आहे

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম