पट्टा किल्ला

       पट्टा किल्ला 


माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड या किल्यावर छ. शिवाजी महाराज यांचे ३५ दिवस वास्तव्य होते.

पट्टा किल्ला

सन १६ नोव्हेंबर १६७९ रोजी शिवाजी महाराज जालना शहरावरील स्वारी करुन,मोगलांच्या ताब्यातील जालनापुर शहर लुटले व रायगडाकडे परतीला निघाले होते.त्यांच्याबरोबर लुटीचा खजिना होता.सोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते, धनाजी जाधव व इतर सरदार होते. ही खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. ही बातमी रणमस्तखानास समजताच तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्याने राजांच्या फौजेची गती हळु होती.हत्ती,घोडी,गाढवे यांच्या वर लादुन ही लुट नेली जात होती.मागुन येणाऱ्या मोगली फौजेने आक्रमण केले.व दोन्ही सैन्याची संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली.युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनिती निश्चित करण्यात आली.याप्रमाणे सेनापती जाधव व हंबीरराव मोहिते मागे राहिले. बहिर्जी नाईक या गुप्तहेरांच्या प्रमुखाने तत्परतेने व चलाखीने त्याने थेट रायगडावर जाण्याच्या मार्गात बदल करुन वेगळ्याच मार्गाने शिवरायांना पट्टा किल्यावर आणले. खरं तर सततच्या मोहिमांमुळे महाराज खूप थकले होते. त्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. याची जाणीव नाईकांना झाली नि शिवराय चक्क पस्तीस दिवस येथे आरामासाठी थांबले तेव्हाच राजांनी या किल्ल्याचं नाव विश्रामगड ठेवले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या पट्टा  किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात १४–१५ व्या शतकात झाले असल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी महादेव कोळी जमातीकडे गेला व नंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजमशाही कडे गेला. इ.स. १६२७ मध्ये मुगलांनी हा किल्ला जिंकला. इ.स. १६७१ मध्ये पट्टा हा किल्ला शिवछत्रपतींच्या आदेशाने मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकला आणि किल्ल्याचा सुवर्णकाळ सुरू झाला.या गडावर अंबा-लिंबा या देवतांचे पुरातन मंदिर आहे. अंबादेवीची मूर्ती सिंहासनावर आरुढ झाली असून अष्टभुजा स्वरूपात आहे. मूर्तीच्या उजव्या चार भुजापैकी एका भुजेमध्ये चक्र, दुसर्‍या भुजेमध्ये सुरा, तिसर्‍या भुजेमध्ये तलवार तर चौथी भुजा आशीर्वाद देणारी आहे. देवीच्या डावीकडील चार भुजांपैकी एका भुजेमध्ये शंख, दुसर्‍या भुजेमध्ये  गदा, तिसर्‍या भुजेमध्ये त्रिशूल आणि चौथ्या भुजेमध्ये ढाल आहे.विश्रामगडाला पायर्‍या नसल्याने डोंगरातील पायवाटेने जावे लागते. तेथील परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी या ठिकाणी छत्रपती शहाजीराजे यांच्या राजधानीचे प्रमुख ठिकाण होते. बाजूला हरिश्चंद्रगड असून त्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच तिरडे या प्रदेशालाही पुराणकाळापासून महत्त्व आहे.
सीतेचे रावणाने अपहरण केलनंतर जटायू पक्षी तेथे आला आणि रावणाने त्याला ठार केले. तेव्हा तो जिथे पडला तेथे त्याच्या पंखांचा आकार उमटला आहे. तसेच सीता प्रभू रामचंद्रांच्या विोगाने जेथे रडत बसली त्या ठिकाणाला तिरडे असे नाव पडले.गडावर आज त्रम्बक दरवाजा,स्वच्छ पाणी असलेले पाण्याचे टाके, अनेक छोट्या मोठ्या गुहा,बारा हौद हे चांगले स्थितीत पहावयास मिळतात तसेच या गडावरून निसर्ग दर्शन खूप छान घडते किल्ल्यावरील हल्लीचे दुरुस्ती कामात शिवकालीन नाणी व तलवार सापडलेली आहे ती देखील तेथे पहावयास मिळते.पट्टा किल्ल्याकडे जाणारे सर्व रस्ते चांगल्या स्थितीत आहेत.
पट्टा किल्ला हा घोटी पासून ३६ किलोमीटर आहे तसेच सिन्नर पासून पट्टा किल्ला हा ३४ किलोमीटर आहे आणि दोन्ही ठिकाणांहून किल्ल्यापर्यंत पोहोचायला सुमारे १ तास लागतो.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম