कोल्हापुरचा रांगडा नायक अरूण सरनाईक
फेसबुक लिंक http://bit.ly/3x3vlX7
कोल्हापूरच्या मातीत जन्मून मोठा नावलौकिक मिळवणारे रांगडे नायक म्हणुन अरूण सरनाईक यांची आोळख आहे.
४ ऑक्टोबर, १९३५ रोजी जन्मलेल्या अरूणचे,वडील महाराष्ट्र कोकिळ शंकरराव सरनाईक हे होत. बलवंत संगीत नाटक मंडळीमुळे महाराष्ट्रभरात त्यांचं नाव झालं होतं. चुलते निवृत्तीबुवा सरनाईक शास्त्रीय गायक होते. भजनसम्राट म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यामुळे अभिनयाबरोबरच अरुण सरनाईकांना घरातूनच गायनाचा वारसा मिळाला होता. ते उत्तम तबलावादक होते. खर्जातल्या आवाजाची उपजत देणगी त्यांना मिळाली होती.
कोल्हापूर तेव्हा ऍन बहरात होते.येथे चित्रपट निर्मिती होत होती.यावेळी कोल्हापुरात नट मंडळी भरपुर होती. चित्रपट वातावरण छान होते.बरेच निर्माते,दिग्दर्शक,तंत्रज्ञ कोल्हापूरात राहत होते. चित्रपटाबरोबरच नाटक,मेळे कोल्हापूरात निर्माण होत होते.उठसुठ मुंबई,पुण्याला जायची गरज भासत नव्हती.
अरूण सरनाईकाना नाटकात काम करण्याची आवड होती.वडिलांच्या आोळखीने त्यांना लहान लहान भुमिका मिळु लागल्या.१९६० च्या दरम्यान गोविंदराव टेंबे यांच्या "जयदेव" नाटकात अरूण सरनाईकांना गायक नट म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली. नंतर मो. ग. रांगणेकर यांच्या 'भटाला दिली ओसरी' हे त्यांचं पहिलं लोकप्रिय नाटक होते.रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे सरनाईकांसाठी अनंत माने यांच्यामुळे दरवाजे खुले झाले.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या "शाहीर परशुराम" हा सरनाईक यांचा पहिला चित्रपट होता.यात त्यांनी परशुरामाच्या मुलाची भूमिका केली. व मराठी चित्रपटाला रांगडा अभिनेता मिळाला.त्या काळात सुर्यकांत,चंन्द्रकांत हे अभिनेते सोडले तर दुसरे नायक म्हणून कोणी निर्माते विचार देखील करत नव्हते.अशा काळात अनंत मानेनी दिलेल्या संधिचे अरूण सरनाईकानी सोने केले.अनंत मानेंच्या सुमारे १५ सिनेमांमधे त्यांनी भूमिका केल्या. केला इशारा जाता जाता, अशीच एक रात्र होती, सवाल माझा ऐका, सांगू कशी मी, गळगौळण, डोंगरची मैना, पाहुणी, एक गाव बारा भानगडी, पाच रंगाची पाच पाखरं, तोतया आमदार ही त्यातल्या काही सिनेमांची नावं. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुमारे पाऊणशे सिनेमे आणि २५ नाटकांमधे भूमिका केल्या.डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन" मधील मुख्यमंत्री आजही लोकप्रिय आहे. ते उत्तम गायक होते."घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतले.
जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक हे कधीकाळी मराठी निर्माते, दिग्दर्शकांसाठी चलनी नाणं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर नानावटी खटल्यावर आधारित "अपराध मीच केला" हे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं नाटक खूप गाजलं. त्यात सरनाईक यांची प्रमुख भूमिका होती.
ते नायक म्हणुन बहरात असताना वयाच्या अवघ्या ४९ वर्षी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.कोल्हापूरहून पुण्याला जात असताना पुणे- बंगळूर महामार्गावर किणीजवळ कार अपघातात ते, त्यांची पत्नी अनिता, व नुकताच इंजिनियर झालेला मुलगा संजय ठार झाले. तेव्हा त्यांची मुलगी मिरज मेडिकल कॉलेजमधे शिकत होती. तारीख होती २१ जून १९८४.
नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर सितम सिनेमात त्यांना भूमिका मिळाली होती. आणखी दोन हिंदी सिनेमांचं चित्रिकरण सुरू होणार होतं. हिंदीतल्या तीन सिनेमांच्या ऑफर्स त्यांना आलेल्या होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूनं पुढचा सगळा अभिनयाचा प्रवासच थांबवला.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवतर्फे त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
====================================
Tags
BLOG