कांदळगांवचा रामेश्वर
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3aqH2hd
जलदुर्गाची निर्मिती करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज मालवणमध्ये आले होते. मालवणमधील कुरटे बेटाची पाहणी करीत जलदुर्गासाठी यापेक्षा चांगली जागा नाही, असे म्हणत याच ठिकाणी जलदुर्ग उभारण्याचे पक्के केले. यानुसार २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन करीत किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. परंतु बांधकामावर दगड टिकत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना कांदळगांवच्या श्री देव रामेश्वराने दृष्टांत दिला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी कांदळगांव येथे जात रामेश्वर मंदिरामध्ये स्वत: घुमटी बांधली. तसेच मंदिरासमोर स्वत: वटवृक्ष लावला. तो वटवृक्ष आजही जिवंत आहे. यानंतर किल्ल्याचे काम भरभरून पूर्ण झाले. शिवकालीन इतिहास लाभलेला कांदळगांव समग्र इतिहासाचा साक्षीदार आहे. श्रीरामेश्वर सर्वाथाने सर्वावर कृपादृष्टी ठेवून आहे.कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पूजन, ओटी भरणे, रात्री पालखी मिरवणूक व नंतर दशावतारी नाटय़प्रयोग होणार आहे. उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री देव रामेश्वर ही गावची प्रमुख ग्रामदेवतेबरोबरच श्री देवी सातेरी, श्री देवी भावई, श्री देवी कमरादेवी, श्री देव सिमेश्वर अशा अन्य ग्रामदेवता आहेत. शिवाजी महाराजांनी १६६४ साली मालवणात सिंधुदुर्ग किल्ला उभारला. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक बिकट समस्या उभ्या राहिल्या. समस्यांवर उपाय शोधत असताना महाराजांना दृष्टांत झाला, की येथून आठ किमी अंतरावरील मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे जाऊन तेथील स्वयंभू श्री रामेश्वराचा जीर्णोद्धार कर.
शिवाजी महाराजांनी या दृष्टांताला अनुसरून कांदळगावी जाऊन तेथील श्री देव रामेश्वराच्या शिविलंगाची यथासांग पूजा करून त्याचा जीर्णोद्धार केला व समोरच वटवृक्षाचे रोपण केले. (जो आजही या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभा आहे) त्यानंतरच सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले.
या ऐतिहासिक घटनेनंतर दृढ झालेले शिवाजी महाराज, भवानी माता, देव रामेश्वराचे ऋणानुबंध जोपासण्यासाठी देव रामेश्वर आपल्या पंचतत्व व रयतेसह त्रवार्षिक भेट किल्ले सिंधुदुर्गला देतात.
या भेटीला ऐतिहासिक भेटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री देव रामेश्वराच्या या भेटीची प्रतीक्षा कोंळबसह मालवण शहराला लागून राहिलेली असते. मार्गात रांगोळी काढत ग्रामदैवतेचे स्वागत केले जाते. यानंतर दुस-या वर्षी श्री देव रामेश्वर कोळंब, महान गावच्या वेशीभेटीला जातो.
कांदळगाव गावची एकी वाखाणण्याजोगी आहे. शिवकालीन बरोबरच पांडवकालीनही वारसा या गावाला लाभला असल्याचे स्पष्ट होते. कांदळगाव गावाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. या गावामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रमाण मुबलक आहेत. दसरोत्सव, रामनवमी, हरिनाम सप्ताह, श्री देव रामेश्वर मंदिर वर्धापन दिन, लक्ष्मीपूजन, राखणीचा नारळ आणणे आदी धार्मिक कार्यक्रम गावामध्ये मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात.
विशेष म्हणजे रामेश्वर आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवून आहे.
निर्मळ मनाने त्याला साद घातली की त्याचा आशीर्वाद लगेच मिळतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. रामेश्वराच्या आशीर्वादाने या गावाला पर्यटनदृष्टय़ा खास दर्जा प्राप्त झाला आहे. देश विदेशातील असंख्य भाविक रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची रचना, येथील निसर्गरम्य वातावरण, गावातील ऐतिहासिक पाऊलखुणा, येथील प्रथा-परंपरा हे सारेच अनुभवण्याजोगे आहे. रामेश्वर मंदिरातील विविध उत्सव आणि या उत्सवांचा थाटमाट आपल्याला श्रद्धेची प्रचिती देत असतो.♏
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________
Tags
धार्मिक
