शूर शिलेदार येसाजी कंक

⚔ इतिहासात ड़ोकावताना⚔ 

                             शूर शिलेदार येसाजी कंक

                   
फेसबुक लिंक  http://bit.ly/2Wo3hNr                                 
   चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानद खोऱ्यातले झुंझारराव मरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या पिंडीसमोर बेलभंडारा हाती घेऊन स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.
शूर शिलेदार येसाजी कंक
इ.स. १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैद्राबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशहा तानाशहाशी हातमिळवणी केली होती. भागानागरीत शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. कुतुबशहा तानाशह सोबत त्याचे सल्लागार मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा तर महाराजांसोबत सरनौबत हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आणि प्रमुख सरदार सूर्याजी मालुसरे, आनंदराव मकाजी, मानाजी मोरे, सर्जेराव जेधे, बालाजी ढमढेरे, सोनाजी नाईक, दत्ताजी त्र्यंबक व प्रल्हाद पंत या सर्वांनी दादमहालात प्रवेश केला.
हारतुरे आणि सरबतपान देऊन तानाशहाने हसत हसत महाराजांना सवाल केला, “राजाजी, आपकी शाही फौज देखकर हमे बडी ख़ुशी हो गयी, लेकीन ताज्जूब कि बात याह ही कि आपके पास हाथी नाही देखा!”  
“नही नही तानाशहाजी, हमारे पास पचास हजार हाथी है! म्हणजे असं की हमारा एक एक सिपाही हाथिके बराबर है! अगर आमच्या माणसाची ताकत तुम्हाला आजमावयाची असेल तर हमारे सामने खडे हुये आदमीयोंसे आप कोई भी आदमी चून सकते है की जो हाथी के साथ जंग करे|” महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं सवालाला जवाब दिला.
कुतुबशहा तानाशहाने महाराजांसमोर असलेल्या पहाडी मर्दांकडे नजर टाकून येसाजी कंकाकडे बोट दाखवीत विचारले, “क्या यह सिपाही हमारे हाथी से टकरायेगा?”
“क्यू नही?” महाराजांनी हसत हसत उत्तर दिले आणि येसाजींची हत्तीसोबत झुंजण्याचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात मादणणाने गोलाकार माळे रचून त्यावर नागरिकांना ही झुंज पाहण्यासाठी बिछायती अंथरल्या. महाराज आणि तानाशहासाठी एका खास माळ्यावर शामियाना उभारला.
झुंजेच्या दिवशी नागरिकांनी माळ्यावर गर्दी केली होती, शामियान्यात बसलेल्या महाराजांच्या चरणी येसाजींनी स्पर्श करून आशीर्वाद मागितला आणि नंग्या समशेरीनिशी पटांगणात उतरले. एवढ्यात साखळदंडानी बांधलेला तानाशहाचा मदांध हत्ती पंचवीस हबशांनी पटांगणात आणला व त्यांचे साखळदंड सोडून ते निमिषार्धात माळ्यावर जाऊन बसले.
हत्ती आणि माणसाची झुंज? कसं शक्य आहे? नागरिक आपआपसात चर्चा करीत होते; पण महाराजंच्या माणसांना हे शक्य होतं. आता कंबर कसून येसाजी पटांगणात उभे राहिले. हत्ती येसाजींना पाहून चवताळून चालून आला; तत्क्षणी येसाजींनी डाव्या अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली.
नागरिक श्वास रोखून पाहात होते; तर तानाशाहाच्या कपाळी घाम फुटला होता. तो जवळ जवळ ओरडलाच “सुभान अल्ला! ये मै क्या देख राहा हुं?”. हुलकावणी दिल्यामुळे हत्ती सरळ पुढे गेला होता, तो माघारी वळला. फिरून पिसाळून त्याने येसाजींवर चाल केली ह्याही वेळी त्यांनी हत्तीला चकवले. सरळ लढण्याऐवजी ते हत्तीला लीलया खेळवत होते, खिजवत होते तसतसा हत्ती बेफाम होत चालला होता. आता येसाजींनीच हत्तीला धडक दिली, शाह थरथर कापू लागला, नागरिकांच्या अंगावर रोमांच उठले.
धडक दिल्यासारशी हत्तीने येसाजींना सोंडेत पकडले; परंतु मोठ्या शिताफीनं येसाजी सोंडेतून निसटले, सारी ताकत एकवटून त्यांनी हत्तीच्या सोंडेवर समशेरीचा घाव घातला. घाव इतका जबरदस्त होता कि जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा जो पळत सुटला तो परत आलाच नाही.
संदर्भ: शूर शिलेदार येसाजी कंक – इतिहास संशोधक कृष्णकांत नाईक                                                                                                                                                                                                                    989o875498            
⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম