नागपंचमी -जुनी आठवण
मराठी शाळेतील नागपंचमी अशी साजरी व्हायची.
तुम्ही पण लहानपणी नक्की अनुभवली असणार.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी घरातील मोठ्या माणसाकडुन पाटीवर नागाचे चित्र काढून घ्यायचे.
शाळेला सुट्टी असली तरी सकाळची शाळा असायची.
सकाळी लवकर उठून पाटीवर काढलेला नाग चिरमुरे लाह्या फुले एखादी अगरबत्ती टाकून शाळेत जायचे. पाटीवर कोणाचा नागाचे चित्र चांगले याची चर्चा व्हायची. मुली केसात फुले गजरे घालून हातात पाटी घेऊन यायच्या. शाळेत फळ्यावर पण भलेमोठे नागाचे चित्र काढलेले असायचे.सर्व वर्गातील मुले त्या दिवशी एकत्र बसायची. मग पाटीवरल्या नागोबाची पुजा केली जायची. गुरूजी नाग सापाबद्दल माहिती सांगायचे.नाग/साप आपला मित्र कसा आहे, तो शेतामधील उंदीर पिकाची नासाडी करतात त्यांना रोखण्यासाठी नाग/साप आपणास कशी मदत करतो हे सांगितले जायचे.
गुरूजी ही माहिती सांगत असताना बरेचजण हळूच एक एक लाह्या खाऊन संपवत असत.शाळा वेगवेगळ्या मिश्र अगरबत्तीने धुरकट वातावरणात सुंगधित झालेली असे.
काही उत्साही मुलेपण पाठ केलेली किंवा कागदावर लिहून आणलेली माहिती सांगत.मग एकमेंकाना लाह्या चिरमुरे देऊन कार्यक्रमाची सांगता होई.
हे सर्व झाल्यावर सर्व मुले आपआपल्या घरी जात.
आता ते दिवस इतिहास जमा झालेत. हल्लीच्या मुलांना पहिलीपासून वह्या असतात. यामुळे पाटीचा तर प्रश्नच नाही.नागपंचमी सण का असतो याचापण पत्ता नाही.
हल्ली शाळेत नागपंचमी पण साजरी होत नाही हे दुर्दैव आहे.
- अनिल पाटील, पेठवडगाव
9890875498