सापशिडी खेळाचे शोधकर्ते संत ज्ञानेश्वर

 सापशिडी खेळाचे शोधकर्ते संत ज्ञानेश्वर

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा सापशिडी खेळ!

तुम्हाला हे वाचुन खरे वाटणार नाही पण सापशिडी या खेळाचा शोध संत ज्ञानेश्वर यांनी लावला आहे.पण हे सत्य आहे,आता आपण या खेळाला सापशिडी म्हणत असलो तरी त्यावेळी या सापशिडी खेळाचे नाव 'मोक्षपट'असे होते.संत ज्ञानेश्वर हे सापशिडी खेळाचे जनक आहेत तसा पुरावा एका परदेशी माणसाने जगासमोर आणला आहे.संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला हा सापशिडीचा शोधही अजरामर आहे.   

 ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा.ल. मंजुळ यांनी उलगडले..इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला होता. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला आहे. संशोधनावेळी जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट  मिळवले परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते.संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

 संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला.लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा ,यामागील उद्देश होता.

सापशिडी खेळाचे शोधकर्ते संत ज्ञानेश्वर

आकार : मोक्षपटाचे दोन्ही पट २० X २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच ६ कवड्यांचा वापर करावा लागतो. ६ कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंची नावे देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे. तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.आंध्रप्रदेश मध्ये या खेळाला तेलगूमध्ये वैकुंठपाली किंवा परमपद सोपना पटम (मोक्षाची शिडी) म्हणतात तर तामीळनाडू मध्ये या खेळाला परम पदम म्हणतात. बंगालमध्ये शापशिरी किंवा शापलुडू म्हणतात तर हिंदी मध्ये सानप और सीधी , सानप सीधी आणि मोक्षपत म्हणतात. 

नंतर इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण केले त्यामुळे सापशिडी हा खेळ आपणास पाश्चात्य वाटतो.(जसा 'चेंडुफळी' हा भारतीय खेळ नंतर क्रिकेट म्हणुन उदयाला आला.पण क्रिकेटचे जनकत्व इंग्रजांना मिळाले) 

‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडीं विषयी माहिती दिली आहे.त्यात‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानेश्वर यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यामध्ये खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार.असा उल्लेख आहे. तसे पाहता शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली,संत निवृत्तीनाथ,संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही बदल करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत.माणसाच्या आयुष्यात जसे चढ उतार येतात तसेच या मोक्षपटावरही कधी शिड्य़ा असत तर कधी गिळून टाकणारा अडचणींचा, संकटांचा साप आहे.सापाने गिळल्यानंतर काही  घर मागे येऊन पुन्हा नवीन उमेदीनं खेळ खेळत मोक्ष मिळविणं हे या खेळाचं सार आहे.सध्याच्या’नैतिक अध:पतनाच्या युगात मुलांना मूल्ये शिकवण्याचा हा एक चांगला मार्ग संत ज्ञानेश्वरांनी या सापशिडीच्या माध्यमातून समाजासमोर ठेवला आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম