मराठी चित्रपटातील रांगडा अभिनेता - सुर्यकांत मांडरे

मराठी चित्रपटातील रांगडा अभिनेता - सुर्यकांत मांडरे 

फेसबुक लिंक  http://bit.ly/3foCedJ
मराठी चित्रपट क्षेत्रात दोन सख्खे भाऊ कार्यरत होते.कोल्हापुरचे असणारे हे दोन भाऊ म्हणजे चन्द्रकांत व सुर्यकांत मांडरे. अगदी राम लक्ष्मणाची जोडी.
मराठी चित्रपटातील रांगडा अभिनेता - सुर्यकांत मांडरे

सुर्यकांत यांचा जन्म कोल्हापुरचा (२ जून १९२६ --- २२ ऑगस्ट १९९९)ते शिंपी समाजाचे होते.प्रथम चन्द्रकांत यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. नंतर सुर्यकांत मांडरे यांनी. दोघेही राजारामपुरीत राहत होते. चन्द्रकांत मांडरे यांचा बंगला शाहुमिल जवळील रस्तयावर तर सुर्यकांत यांचे घर ६ व्या गल्लीत होते. (आता ते पाडुन डेव्हलप केले आहे, मी शाळकरी वयात असताना त्यांच्या घरासमोरून जाताना त्यांचे दर्शन होई.) ्यांची आई तानुबाई तुकाराम मांडरे आणि वडील तुकाराम नारायण मांडरे यांच्या मायेच्या आणि शिस्तीच्या छताखाली, मोठे बंधू चंद्रकांत उर्फ गोपाळ मांडरे यांच्यासह कुळाचार आणि परंपरा जपणार्‍या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. कोल्हापुरात सुरुवातीला सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर लक्ष्मीपुरीतील हरिहर विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले.सूर्यकांत यांचे उमदे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व भालजी पेंढारकरांसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि १९३८ साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ‘ध्रुव’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. शालेय शिक्षण एकीकडे सुरू होते, पण अभिनयाकडे, कलेकडे मन ओढ घेत होते. १९४३ साली मात्र शिक्षणाची वाट थांबली आणि बाबा गजबर या एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले. दरम्यान शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.
चंद्रकांत मांढरे यांची ओळख उत्तम चित्रकार अशी असली तरी सूर्यकांत यांनीही कुंचला हाती घेतला होता.
व्यायामाने कमावलेले शरीर, मर्दानी आणि रांगडे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या चित्रपटातील भूमिका हुबेहूब वठवल्या. १९५० साली राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘केतकीच्या बनात’ या चित्रपटामध्ये ‘सर्जेराव’ ही टर्रेबाज आणि रगेल नायकाची भूमिका केली. चित्रपट मंडळाकडून ‘फक्त प्रौढांसाठी’ असे शिफारसपत्र मिळालेला हा पहिला मराठी बोलपट होता.

सूर्यकांत यांना एकामागून एक चित्रपटांसाठी विचारणा होत गेली. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात अभिनय केला. या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मुख्य नायक, खलनायक, साहाय्यक अभिनेता, चरित्र भूमिका, पाहुणा कलाकार, तर काही चित्रपटात विनोदी भूमिकाही साकारल्या. अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणार्‍या व धाडसी, कणखर, मर्दानी बाण्याच्या या नायकाने ग्रामीण चित्रपटात एक वलय निर्माण केले. ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’, ‘गृहदेवता’, ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मणी नायकही रंगवला. त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. या जोडीने एकंदरीत सत्तावीस चित्रपट केले. सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबरही केलेले चित्रपटही नावाजले गेले.
 ‘शिकलेली बायको’ (१९५९) या चित्रपटात, डॉक्टर असलेल्या सुशिक्षित पत्नीबरोबर पूर्वग्रहाने आणि आकसाने संसार करणारा नायक ‘रघुनाथ’ ही त्यांची उत्कृष्ट भूमिका होती. ‘साधी माणसं’ या चित्रपटात रंगभूषेशिवाय साकारलेला ‘शंकर लोहार’ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. १९६५ साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. ‘कन्यादान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना १९६० साली राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. चित्रपटसृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाळणारे सूर्यकांत हे एक निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते. सूर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत (गोपाळ) यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक बंधुप्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनुभवले आहेत. या दोन्ही बंधूंनी चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
शिलंगणाचे सोने’, ‘जय भवानी’, ‘महाराणी येसूबाई’, ‘थोरातांची कमळा’, ‘पावनखिंड’, ‘स्वराज्याच्या शिलेदार’, ‘गनिमी कावा’ या ऐतिहासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला. पाणीदार, बोलके डोळे, मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणे, यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत हुबेहूब उठून दिसत. चित्रपटातील साहसदृश्यात डमी कलाकार न वापरता, त्यांनी घोडेस्वारीची कठीण व जीवावर बेतणारी दृश्ये स्वत: मेहनतीने वठवली. ‘रत्नघर’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वाघाबरोबरची झुंज असे प्रत्यक्ष दृश्य दिले. चित्रपटसृष्टीचे रंगढंग अनुभवत समर्पणाने अभिनयकला जोपासली. ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटात सत्तू भोसला ही भूमिका करत असतानाच दिग्दर्शक वसंतराव पेंटर यांनी पटकथा आणि संवादलेखनामध्ये सूर्यकांत यांना सहभागी करून घेतले.
चित्रपटांच्या बरोबरीने रंगभूमीही गाजवली. त्यांनी पाच ऐतिहासिक, अकरा सामाजिक आणि वीस ग्रामीण नाटकात अभिनय केला. ‘बेबंदशाही’, ‘झुंजारराव’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पाठलाग’, ‘दसरा उजाडला’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा कितीतरी नाटकांचे महाराष्ट्रभर प्रयोग केले.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম